सुवर्ण मंदिरावरील हल्ला हाणून पाडला !   

भारतीय लष्कराकडून स्पष्ट; पाकिस्तानची ड्रोन, क्षेपणास्त्रे पाडली 

अमृतसर : पंजाबमधील शीख धर्मीयांचे प्रार्थनास्थळ सुवर्ण मंदिर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा हल्ला करुन उद्ध्वस्त करण्याचे पाकिस्तानी लष्कराचे मनसुबे भारतीय लष्कराने हाणून पाडले. पाकिस्तानी लष्कराने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन मंदिराच्या डागली होती. मात्र, भारतीय लष्कराने ती मंदिरावर पडण्यापूर्वीच हवेत नष्ट केली होती. याबाबतची माहिती सोमवारी लष्कराच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे 
  
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील आठ दहशतवादी ठिकाणे आणि ९ लष्करी ठाणी आक्रमक हवाई हल्ले करुन उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने  बदला घेण्यासाठी आठ मे रोजी सुवर्ण मंदिराच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागली होती.. मात्र, लष्कराच्या हवाई संरक्षक तोफांनी ते हल्ले हाणून पाडले, अशी माहिती पंधराव्या पायदळ विभागाचे जनरल ऑफसर कमांडिंग (जीओसी) मेजर जनरल कर्तिक सी शेषाद्री यांनी काल दिली. 
 
ते म्हणाले,  भारताने दहशतवादी ठिकाणे आणि लष्करी ठाणी उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला प्रति हल्ले करण्यासाठी एक तर भारताची लष्करी ठाणी किंवा प्रार्थनास्थळांवर हल्ला करण्याचा पर्याय होता. लष्करी ठाण्यांवरील हल्ले भारत चोखपणे परतावून लावणार अशी खात्री असल्याने त्याने ठाण्यांसह  प्रार्थनास्थळे आणि रहिवाशी ठिकाणांना निवडले. त्यात अमृतसर येथील सुवर्ण मंदिर प्रमुख लक्ष्य होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लष्कराने मंदिर परिसरात हवाई संरक्षण कवच पुरवले होते. तसेच सुरक्षेसाठी हालचाली वेगाने केल्या होत्या. ते म्हणाले, पाकिस्तानने हल्ल्यासाठी शस्त्रयुक्त मानवरहित विमाने आणि प्रामुख्याने ड्रोनचा वापर केला. तसेच दीर्घ पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा स्वैर वापर केला होता. मात्र, लष्कर पूर्णपणे सज्ज होते. आमचे जवान आणि लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने मंदिरावरील हल्ले परतावून लावले. येणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे आदळण्यापूर्वीच हवेत नष्ट केली. त्यामुळे सुवर्ण मंदिर सुरक्षित राहिले. त्याला साधा ओरखडा देखील आलेला नाही, असे शेेषाद्री यांनी सांगितले.

Related Articles